नंदुरबार: एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन विनाअट मागे घ्यावे अशी मागणी करीत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंदु सेवा सहाय्य समितीने आज पाठिंबा दिला. कर्मचाऱ्यांनी चालवलेल्या संपाच्या ठिकाणी जाऊन समितीच्यावतीने पाठिंबा देणारे पत्र संपकरी कर्मचाऱ्यांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांना मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने २०५३ एस.टी. कर्मचारी यांचे निलंबन विनाअट मागे घ्यावे, एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,कमी वेतनामुळे आत्महत्या केलेल्या ३६ पेक्षा अधिक कर्मचारी यांचा कुटुंबीयांना भरीव आर्थिक मदत देऊन त्यांचा घरातील ऐका व्यक्तीस शासकीय नौकरी द्यावी. अश्या आशयाची मागणी करण्यात आली.
तुटपुंज्या पगारावर महाराष्ट्रातील नागरिकांना महानगरा पासून ते खेड्या- पाड्यापर्यंत पोहचविण्याचे काम एस.टी. कर्मचारी करत असतो. सण असो वा उत्सव यावेळी आपल्या परिवारापासून लांब राहून ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात. अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी संप पुकारावा लागला, हे दुर्दैवी आहे; असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, कपिल चौधरी, पंकज डाबी,सुयोग सूर्यवंशी,धनराज तांबोळी यांच्या स्वाक्षरी आहेत