नंदुरबार – क्रूर मोगल आक्रमक ‘राष्ट्र निर्माता’; तर मग प्रभू श्रीरामांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत हिंदु राजे कोण होते ? असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीने जाहीरपणे कबीर खानला केला आहे. कबीर खान यांनी इस्लामी अफगाणिस्तानात जाऊन राष्ट्रनिर्माण करावे; असा टोलाही लगावला आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात हा प्रश्न केला आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मागील आठवड्यातच अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर तेथील जनतेवर होणारे अत्याचार आणि देशातून पलायन करण्यासाठीचा त्यांचा संघर्ष समोर येत आहे. 12 वर्षांच्या मुलींना शोधून जबरदस्तीने घेऊन जाण्यापासून ते पत्रकार आणि नागरिक यांच्या हत्या करण्यापर्यंतचे सत्य आधुनिक माध्यमे जगापुढे आणत आहेत. मागील सत्ताकाळात तालिबान्यांनी बामियानच्या प्राचीन बुद्धमूर्ती कशा उद्ध्वस्त केल्या, ते सर्वांनी पाहिले आहे. आताच्या आधुनिक काळात अल्पसंख्य आणि अन्य पंथांची श्रद्धास्थाने यांच्यावर एवढे अत्याचार केले जात असतील, तर ७००-८०० वर्षांपूर्वी भारतावर आक्रमणे केलेल्या मोगल आक्रमकांनी किती अत्याचार केले असतील, याची कल्पनाच न केलेली बरी ! हे सर्व सत्य दडपून टाकण्यासाठी भारतातील विशिष्ट गट प्रयत्न करत असतो, त्यातून टीपू सुलतानला ‘देशभक्त’ ठरवण्यापासून ते औरंगजेबाला ‘सुफी संत’ ठरवण्याचे प्रयत्न त्यांचे चालू असतात. भारतातील बॉलीवूड तर यात अग्रस्थानीच असते. पाकिस्तानने भारतावर आक्रमण करून जवानांच्या हत्या केल्याचे दुःख न बाळगता, ते पाकिस्तानातील कलाकारांना भारतात आणून त्यांच्याशी भाईचारा दाखवून त्यांना रोजगार मिळवून देत असतात. यातच ‘दी एम्पायर’ नामक बाबराचे उदात्तीकरण करणारी वेबसिरीज प्रदर्शित होत असतांना, बॉलीवूडचे एक दिग्दर्शक कबीर खान यांना तर मोगलच खरे ‘राष्ट्र निर्माता’ असल्याचा साक्षात्कार झाला. मोगल आणि मुसलमान शासक यांना खलनायक दाखवणे, हे चिंताजनक वाटते, असे ते म्हणाले. आक्रमक मोगल जर ‘राष्ट्र निर्माते’ होते, तर मग भारतभूमीतील प्रभू श्रीरामांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत होऊन गेलेले हिंदु राजे कोण होते, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. 17 वेळा सोमनाथाचे मंदिर, 18 वेळा जगन्नाथाचे मंदिर कोणी लुटले ? अयोध्या-मथुरा-काशी येथील हिंदूंची भव्य मंदिरे कोणी उद्ध्वस्त केली ? शीख गुरूंवर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या कोणी केली ? 30 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये इस्लामी राष्ट्रनिर्माणाचे कार्य करण्यासाठी हिंदु पंडितांवर केलेल्या अत्याचारांनी विस्थापित झालेल्यांपैकी एकही हिंदु पंडित आज काश्मीरमध्ये परतलेला नाही. इतके होऊनही भारतात असुरक्षित, भीती वाटत असल्याचा कांगावा करत हतबल होऊन रहाण्यापेक्षा आता संपूर्ण इस्लामी शरीयत लागू असणार्या अफगाणिस्तानात जाऊन तेथे त्यांनी राष्ट्रनिर्माणाचे कार्य करावे, असा सल्ला हिंदु जनजागृती समितीने कबीर खान यांना दिला आहे.
मोगल आक्रमकांच्या वास्तविक अत्याचारी इतिहासावर पांघरूण घालून तालिबानचे समर्थन करण्याचा हा डाव आहे. खरे तर या आक्रमकांच्या क्रूरतेचे वर्णन त्यांच्याच अखबार आदी इतिहासग्रंथांत आहे. त्यात त्यांचे हिंदूंना बळाने मुसलमान बनवण्याचे, मंदिरांचा विध्वंस करण्याचे, महिलांना गुलाम बनवण्याचे दिलेले आदेश आजही उपलब्ध असतांना त्यांना खलनायक दाखवण्याविषयी खेद व्यक्त करण्याचे आश्चर्य वाटते. शीख गुरु, स्वतःचा भाऊ दारा शिकोह, छत्रपती संभाजी महाराज यांचे हाल हाल करून हत्या करणारा क्रूरकर्मा औरंगजेब हा ‘राष्ट्र निर्माता’ होता का ? तालिबानी विचारसरणीला साहाय्य करणार्या कबीर खान यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या आगामी सर्व चित्रपटांवर, तसेच क्रूर बाबराचे उदात्तीकरण करणारी ‘दी एम्पायर’ वेबसीरीज दाखवणार्या ‘डीस्ने-हॉटस्टार’वर बहिष्कार घालावा, असे आवाहन समितीने केले आहे.