नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्याप्रसंगी ईसीआरपी-II अंतर्गत भारत सरकारने जारी केलेला निधी आरोग्याच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी वापरला जात आहे का ? आणि अन्य स्रोतांकडून उपलब्ध होणारा 100% निधी राज्यांकडून आरोग्य संस्थांना तातडीने जारी केला जातो आहे का ? हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सुनिश्चित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
चाचणी, मागोवा, उपचार, लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधासाठी योग्य वर्तनाचे पालन, या पंचसूत्रीला अधोरेखित करत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ बलराम भार्गव तसेच आरोग्य संशोधन विभागाचे आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश गोखले हे देखील उपस्थित होते.
संशयित रुग्ण त्वरित ओळखण्यासाठी आणि त्याचे पुढील वैद्यकीय व्यवस्थापन सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने चाचण्या वाढवणे आणि देखरेख ठेवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आले. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये पीटी -पीसीआर चाचणीची उपलब्धता सुनिश्चित करण्याचा सल्लाही देण्यात आला. मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होणाऱ्या जिल्ह्यांनी रुग्णांवर नियमितपणे लक्ष ठेवण्यासाठी आणि संपूर्ण जनुकीय अनुक्रम निर्धारणासाठी निश्चित केलेल्या आयएनएसएसीओजी (भारतीय सार्स – सीओव्ही – 2 जीनोमिक्स कन्सोर्टियम) प्रयोगशाळेत त्वरित सकारात्मक नमुने पाठवण्यासाठी जागरूक राहावे असे सांगण्यात आले.
क्षेत्रीय स्तरावरील सर्व आरोग्य सुविधांमध्ये व्हेन्टिलेटर्स, पीसीए संयंत्र, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर इ.कार्यान्वित असणे सुनिश्चित करावे. काही क्षेत्रीय रुग्णालयांमध्ये केंद्राने पुरविलेले अनेक व्हेन्टिलेटर्स अजूनही उघडलेले सुद्धा नाहीत आणि न वापरता तसेच पडून आहेत अशी माहिती राज्यांना देण्यात आली आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोविड-19 च्या वैद्यकीय उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या आठ महत्वाच्या औषधांसाठी पुरेसा अतिरिक्त साठा राखून ठेवणे सुनिश्चित करण्याचे आवाहन आरोग्य सचिवांनी राज्यांना केले.
अफवांना आळा घालण्यासाठी आणि लस घेण्यासाठीच्या संकोचाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी नियमित पत्रकार परिषदेसह पुरावे-माहिती जागरूकता मोहिमा आयोजित करण्याचे या बैठकीत सुचविण्यात आले.
आगामी हिवाळा ऋतू लक्षात घेता, शीतज्वर (थंडीताप) सदृश आजार (ईएलआय) गंभीर तीव्र श्वसन संसर्ग (एसएआरआय) आणि श्वासोच्छवासाच्या त्रासाच्या लक्षणांचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. प्रभावी गृह विलगीकरणासाठी देखरेख यंत्रणेचा आढावा घेण्यासंदर्भात जोर देण्यात आला.