धुळे – पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी हद्दवाढ गावासह शहरातील लोकांनी अर्ज दाखल केले होते. तथापि केवळ निधी विषयक पत्राअभावी त्याला अनेक महिने विलंब झाला असून लाभार्थी वंचित रहात आहेत. वरखेडे गावातील पत्रकार गजेंद्र नारायण पाटील यांनी हा विषय लावून धरत सातत्याने 3 वर्षे धुळे मनपाचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी यांच्यापासून राज्य उपसचिव व थेट राज्यपाल यांच्यापर्यंत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याला आता यश मिळाले असून मनपा आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ते पत्र देण्याची प्रक्रिया केली आहे. दरम्यान, याच पाठपुराव्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या 250 लाभार्थ्यांचा डिपीआर 3 मंजुर देखील झाला आहे.
ही माहिती देतांना गजेंद्र पाटील यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केलेल्या लोकांना त्वरीत योजनेचा लाभ मिळावा यासाठी मनपाचे तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांच्यासह नगर रचना विभागाचे अधिकारी तसेच पंतप्रधान आवास योजनेचे रोहित सोनार, कल्पेश मराठे यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. परंतु गरीब लाभार्थ्यांचे काम सरकत नव्हते. म्हणून राज्यांचे राज्यपाल श्री भगतसिंगजी कोश्यारी यांची भेट घेऊन कैफियत मांडली. पंतप्रधान योजना तात्काळ मार्गी लावून सर्वसामान्य लोकांना योजानेचा लाभ करुन देण्याची लेखी विनंती केली. वेळोवेळी धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क चालू ठेवला. दरम्यान, म्हाडाचे प्रमुख आधिकारी मोगडीकर यांनी दखल घेतली. मोगडीकर यांनी पंतप्रधान योजनेसाठी अर्ज केलेल्या लोकांचा प्रस्ताव घेवून जात दिल्लीतील बैठकीत तब्बल 250 लाभार्थ्यांचा डिपीआर क्र 3 मंजुर करवून घेतला. त्यालाही आज चार ते पाच महिने ऊलटले असून योजनेला प्रारंभच झाला नाही. गजेंद्र पाटील यांनी पुन्हा धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. त्यावेळी निधी अभावी योजनेला सुरुवात करता येत नसल्याचे सांगण्यांत आले. मग पुन्हा म्हाडाचे प्रमुख आधिकारी मोगडीकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की योजने सुरुवात करता येवू शकते कारण 250 लाभार्थाचा डिपीआर क्र3 मंजुर आहे. परंतु धुळे महानगरपालिकेने निधी मागणीबाबतचे पत्र गृहनिर्माण विभागाकडे म्हणजे शासनाकडे पाठाविले नसल्याने निधी वितरीत झाला नाही; याचाही ऊलगडा त्यांनी केला. याच दरम्यान, मंत्रालयात उपसचिव कनके यांच्याशी संपर्क साधत माहिती जाणून घेतली. या योजनेला किती निधी लागणार याबाबतचे पत्र मनपाकडून शासनाकडे आले नसल्याने निधी वितारीत झालेला नाही आणि म्हणून विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनपाने शासनाकडे निधी मागणीचे पत्र पाठविणे आवश्यक असल्याचे उपसचिव कनके यांनीही सांगितले.
मग याबाबत दि 25 जानेवारी 2022 रोजी आयुक्त देविदास टेकाळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मनपाकडून शासनाकडे निधी मागणी बाबतचे पत्र पाठविले कि नाही? याचा काल दि 27 जानेवारी 2022 रोजी पुन्हा तपास केला. महासभा संपल्यानंतर आयुक्त देविदास टेकाळे यांची भेट घेऊन विचारणा केली. तेव्हा कुठे शासनाला निधी वितरीत करण्याबाबतचे पत्र पाठविण्याविषयी त्यांनी संबंधीताना सांगितले. याप्रकारे अखेर पत्रकार गजेंद्र पाटील यांनी सतत 3 वर्षे चालवलेल्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत धुळे शहरातील 250 लाभार्थ्यांचा डीपीआर 3 मंजुर झाला असून निधी विषयीची प्रक्रिया सुरू होऊ शकली आहे.