नंदुरबार :- महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभू राजे यांना मानणारी भूमी आहे. ज्या क्रूरकर्मा औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे तोडली, जिझिया कर लावला, लाखो हिंदूंची कत्तल केली, एवढेच नाही तर धर्मवीर शंभू राजे यांचा छळ करून त्यांची हत्या केली, त्या औरंगजेबाला या भूमीतून हद्दपार केले पाहिजे. यासाठी राज्यात औरंगजेब याचे पोस्टर, बॅनर लावणे, झळकावणे आदी सर्वांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देऊन करण्यात आली.
नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हरीश भामरे यांना सदर निवेदन देण्यात आले. या वेळी समितिच्या वतीने सर्वश्री सुमित परदेशी, जितेंद्र मराठे व हर्षल देसाई हे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर झाल्यापासून हेतुपुरस्सर राज्यात औरंगजेबाचे बॅनर लावणे, स्टेटस ठेवणे, धार्मिक मिरवणुकीत फलक झळकावणे आदी प्रकार वाढलेले आहेत. मागे कोल्हापूर येथे अशाच प्रकारे आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला होता. जळगाव जिल्ह्यातील जानेवारी 2025 मध्ये 2 ठिकाणी काढलेल्या संदल मध्ये अनावश्यक आणि जाणीवपूर्वक औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सध्या राज्यात शिवराय आणि शंभूराजे यांना मानणारे राज्यकर्ते सत्तेत आलेले आहेत, त्यामुळे शंभूराजे यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे बॅनर, पोस्टर यांवर संपूर्ण राज्यभरात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.